Thursday 11 May 2017

National Technology Day : ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
----------------------------------------------------


तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले. आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे. सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
२००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.
** आधुनिक सणवार : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
११ मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि ३० ऑक्टोबरला राष्ट्रीय शास्त्रज्ञ दिवस, असे तीन, विज्ञानाशी संबंध असलेले दिवस भारतात पाळले जातात. ११ मे १९९८ रोजी पोखरण-०२ या यशस्वी अण्वस्त्र चाचण्या केल्या, २८ फेब्रवारी १९२८ रोजी चंद्रशेखर रामन यांनी नोबेल पारितोषिक विजेता शोध लावला, तर ३० ऑक्टोबर १९०९ हा, भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे. ११ मे १९९८ हा पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा झाला.
११ मे १९९८ रोजी भारताने, अणुगर्भीय चाचण्या साखळ्यांतील, पोखरण-२ प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. दोनच दिवसांनंतर म्हणजे १३ मे रोजी शक्ती-४ आणि शक्ती-५ आणखी दोन अणुचाचण्या घेतल्या. शक्ती-१ ही प्रभंजन प्रकारची, ४ ते ६ किलोटन क्षमतेची, शक्ती-२ अणुसंमिलन प्रकारची, १२ ते २५ किलो टन क्षमतेची, शक्ती-३ ही १ किलो टनपेक्षा कमी क्षमतेची होती. १३ मेच्या अणुचाचण्या कमी क्षमतेच्या होत्या. शक्ती-१ आणि शक्ती-२ या चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा बरीच कमी होती. त्यामुळे, भारताच्या या चाचण्या अयशस्वी झाल्या अशी ओरड काही विदेशी संस्थांनी केली, परंतु आमचे तंत्रज्ञान कमी पडले असा खुलासा भारत सरकारने केला.
१८ मे १९७४ रोजी भारताने पहिली अणुस्फोट चाचणी घेतली आणि ती यशस्वी झाली. सायरस अणुभट्टीसाठी, जड पाणी देताना अमेरिकेने अशी अट घातली होती की त्या भट्टीत निर्माण झालेले प्लुटोनियम-२३९, अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरले जाणार नाही.  ते अण्वस्त्र चाचणीसाठी वापरले गेले म्हणून अमेरिका आणि काही देशांनीसुद्धा, भारताच्या सर्वच अणुप्रकल्पांना असहकार दर्शविला, परंतु आपले प्रकल्प, स्वबळावर यशस्वी होतच राहिलेत. ते भारतीय तंत्रज्ञान विकासाचे यशच म्हटले पाहिजे. या पहिल्या अणुस्फोट चाचणीला- ‘बुद्धाने स्मितहास्य केले’, ‘बुद्धा स्माईल्ड’ असे संबोधिले जाते. ‘बुद्धाने स्मितहास्य केले’ असे पहिल्या अणुचाचणीच्या वेळी म्हटले जाते, कारण कदाचित, ती चाचणी बुद्धपौर्णिमेलाच करावयाची होती, पण तिला अकरा दिवस उशीर झाला. त्याच सुमारास, भारतीय रेल्वेचा भारतव्यापी संप सुरू होता हे आपल्याला आठवत असेलच. ११ मे १९९८ रोजी मात्र बुद्धपौर्णिमेची तिथी बरोबर साधली आणि बुद्धाने पुन्हा एकदा स्मितहास्य केले. अणुतंत्रज्ञान विकासाबरोबरच, भारताने, अवकाशसंशोधन, क्षेपणास्त्रे, उपग्रह दळणवळण, आयटी क्षेत्र वगैरे बाबतींतही नेत्रदीपक प्रगती केली आहे.
११ मेला आणखीही एक, भारताच्या इतिहासात महत्त्वाची घटना घडली आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय जनगणना आयोगाच्या, लोकसंख्या घडय़ाळानुसार, ११ मे २००० रोजी, १ अब्ज हा आकडा आला तेव्हा, बरोबर १२ वाजून ३२ मिनिटांनी दिल्लीत कुमारी आस्था अशोककुमार अरोरा या ‘अब्जाव्या’ भारतीय नागरिकाचा जन्म झाला आणि ती कन्या होती हे विशेष, भारताची लोकसंख्या अधिकृतपणे एक अब्ज झाली.
वाढती कारखानदारी, त्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा अनिर्बंध वापर, उपयोगात आणलेल्या, वापरून झालेल्या वस्तूंची आणि पदार्थाची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणातील वाढते प्रदूषण, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, दैनंदिन गरजा आणि चैनी भागविण्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी दिवसेंदिवस वाढतच जाणारी जीवघेणी स्पर्धा इत्यादी विज्ञानीय प्रगतीच्या दुष्ट परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी, समाजातील विचारवंतांनी निरनिराळे दिवस किंवा ‘दिन’ पाळण्याची प्रथा किंवा प्रघात रूढ केला.
त्या निमित्ताने एखादी विशिष्ट समस्या प्रकर्षाने चर्चिली जावी, त्या समस्येचे वास्तवरूप जनमानसाला समजावे, त्यावर योग्य ती उपाययोजना व्हावी, सर्वाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न व्हावेत, असा या निरनिराळे ‘दिन’ पाळण्याचा किंवा साजरे करण्याचा मुख्यत्वेकरून उद्देश असतो.
थोडक्यात म्हणजे हे निरनिराळे ‘दिन’ पाळणे म्हणजे आधुनिक सणवार पाळण्यासारखेच आहे. ज्या दृष्टिकोनातून पूर्वी सणवार आणि व्रतकैवल्ये रूढ झालीत, त्याच जनहिताचा आणि समाजहिताचा विचार आजही कायम आहे, सक्रिय आहे असाच अर्थ हे ‘दिन’ साजरे करण्यामागे आहे, असे वाटते.
** तंत्रज्ञान दिवस
मे महिन्यामध्ये आपण ‘तंत्रज्ञान दिवस’ साजरा करतो. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, तेही स्वत: प्राप्त केल्यावरच विकास होऊ शकतो. ज्या-ज्या वेळेला आपण आपल्या विकासासाठी, अणुतंत्रज्ञान असो वा अवकाश तंत्रज्ञान, विकसित करण्याचे प्रयत्न केले , त्या-त्या वेळी इतर राष्ट्रांनी आपल्यावर बंधने घातली. पहिल्या अणुस्फोटानंतर अमेरिकेने, यशस्वी रॉकेट प्रयोगानंतर रशियाने मार्गात विघ्ने घातली. रशियन भूमीवरून आपला उपग्रह आकाशात झेपावण्याच्या तयारीत असताना, रशियाने उड्डाणाची रक्कम वाढवून मागितली. ‘साईट’ या शैक्षणिक उपग्रहीय संदेशवहनाच्या यशस्वी प्रयोगानंतर अमेरिकेने दुसरा उपग्रह नाकारला, तेव्हा आपल्याला ‘स्टेप’ या दुस-या प्रयोगासाठी जर्मनीच्या ‘सिंफनी’ या उपग्रहाची मदत घ्यावी लागली.
हे सर्व या इथे सांगायचे कारण, सवंग प्रतिक्रिया व्यक्त न करता, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रयोगांकडे आपण डोळस व विधायक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.
( सौजन्य- मराठी विज्ञान परिषद )
Source : http://prahaar.in
#राष्ट्रीयतंत्रज्ञानदिवस #NationalTechnologyDay

आपली माणसं


No comments:

Post a Comment

Popular Posts