Wednesday 12 April 2017

Jayant Bapat- जयंत बापट....आयुष्य बदलणारी व्यक्ती,



मी व माझी पत्नी सुनंदा - आम्हीं दोघेही वाईचे. बालवर्गापासून एका वर्गात होतो. १९५५ साली s.s.c. पास होऊन दोघेही मुंबईस आलो. सुनंदा नोकरीसाठी आली. मी तेथे रसायनशास्त्रात पदवी केली. B. Sc. नंतर लगेचच मी बडोद्याला अलेंबिक केमिकल्समध्ये शिफ्ट केमिस्ट म्हणून नोकरीला लागलो.

त्याचबरोबर तेथील M. S. University मध्ये M.sc. (Organic Chemistry) मध्ये नाव नोंदवले. बरेच महिने रात्रपाळी करून दिवस कॉलेज केले पण त्यानंतर मला वडिलांसमान असलेल्या वाईच्याच श्री. भाऊसाहेब देवकुळे यांनी मदत केल्याने नोकरी सोडून वर्षभर फक्त अभ्यास केला व १९६३ मध्ये M. Sc. पहिल्या वर्गात पास झालो. लगेच पुन्हा अलेंबिकमध्ये Research Chemist म्हणून नोकरीला लागलो. १९६३ मध्येच मी व सुनंदा विवाहबद्ध झालो.

१९६५ मध्ये मला मेलबर्न येथील मोनॅश विद्यापीठातर्फे डॉक्टरेट करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. जून १९६५ मध्ये मी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाय ठेवले. नऊ महिन्याच्या आमच्या पहिल्या मुलीला घेऊन सौ. सुनंदा १९६६ मध्ये आली. हा देश त्यावेळी अगदीच वेगळा होता. भारतीय मसाले, लोणची, आपल्या भाज्या, कणिक वगैरे काहीही मिळत नसे. आमची मुलगी सारखीच आजारी असायची व आमच्या भाड्याच्या घरापासून ३० मैल असलेल्या हॉस्पिटलमध्ये तिला कायम ठेवावे लागे. १९७० - ७१ पर्यंत आमचे दिवस फारच कठीण गेले.

१९६८ ऑक्टोबरमध्ये मला डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर १९९७ पर्यंत ऑरगॅनीक केमिस्ट्री शिकवत व त्यामध्ये संशोधन करत १९९७ ला मी सेवानिवृत्त झालो. १९५५ पासून केमेस्ट्रीशी असलेला संबंध तुटला.

मात्र यापूर्वीच म्हणजे १९८० सालापासून एका अत्यंत अनपेक्षित घटनेमुळे माझ्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. ब्राम्हण कुळात जन्म घेतला असला व शाळेत संस्कृत व घरी ४ - ५ स्तोत्रे म्हणण्यापलीकडे हिंदुधर्म व्रतवैकल्य, धार्मिक विधी यांचेशी माझा काहीच संबंध नव्हता. मात्र १९८० साली माझ्या एका जवळच्या मित्राच्या पत्नीचा फोन आला " मला शेवटास पोचलेला कर्करोग झाला आहे डॉक्टरांनी मला फार तर मला दोन महिने दिले आहेत.

ऑस्ट्रेलियात ब्राम्हणही कोणी नाहीत व विधीही कोणालाच येत नाही. तेव्हा तू माहिती गोळा कर व माझा अंत्यविधी कर " हां तो फोन मनाच्या अत्यंत विकल अवस्थेत मी सर्व माहिती शोधून काढली. आमचे परममित्र मधुकाका दातार यांनी मला मोठेच सहाय्य केले. महिन्याभरात मित्राची पत्नी वारली तिची अंत्येष्टी हा मी केलेला पहिला विधी. समाजाला एवढी जरूर आहे तर आपण रितसर पूजाअर्चा करावयास शिकले पाहिजे व लागले पाहिजे असा मी निश्चय केला व आजतागायत लग्ने, मुंजी, वास्तुशांती, सत्यनारायण, रुद्र इ. विधी मी केले आहेत. आजपर्यंत ७५० विधी झाले आहेत.

त्याचवेळी असेही ठरवले होते की परमेश्वराने आपल्याला पैसा दिलेला आहे. जी कांही दक्षिणा लोकं देतील ती सर्व गोरगरीबांना द्यावी. तो नियम मी आजवर पाळत आहे. त्यानिमित्ताने भारतात आमट्यांच्या सर्व प्रकल्पांना भेट दिली. बाबांशी बरेच दिवस पत्र व्यवहार होता. आम्हीं दोघे आमच्या नशिबाने बाबांचे निधन होण्यापूर्वी त्यांना भेटून आलो. प्रकाश, विकास, कौस्तुभ, अनिकेत, साधना ताई या सर्वांचा थोडा सहवास लाभला. आमट्यांच्या ऐरावती कार्याला माझा मुंगीचा हातभार आज बरेच वर्षे लागतो आहे.

अध्यापनाचा व्यवसाय करतानाच मला जाणवले की भारतीयांचे इंग्लिश उच्चार साहेबाला कळायला जड जाते. वकृत्व, उत्तम इंग्लिश बोलणे व लिहिणे, वादविवाद स्पर्धा या सर्व गोष्टी आपल्याला येणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मी येथे Toastmaster International ही संस्था पाहिली व लगेचच सभासद झालो. १८ वर्षे या संस्थेत काम करून मी ऑस्ट्रेलियात Educational Districr Governor बनलो. अगदी थोड्या वार्षिक वर्गणीत ही संस्था तुम्हाला उत्तम वक्तव्य, वक्तव्याचे मुल्यमापन, मिटींग्ज कशा चालवाव्यात, अध्यक्षाची कामगिरी व जवाबदारी इत्यादी गोष्टी शिकवते .

या सर्वांमध्ये तुमच्या परीक्षा घेऊन वेगवेगळे मान व किताबही मिळतात. मी टोस्टमास्टर्स सर्वोच्च मान DTM (Distinguished Toastmaster) हा मिळविला. त्यानंतर बऱ्याच भारतीय लीकांना मी या संस्थेचे सभासद होण्यास प्रवृत्त केले व दोन हायस्कूलमध्ये १५ वर्षे प्रतिवर्षी वक्तण्याचे विनामूल्य शिक्षण दिले. आमच्या मोनॅश विद्यापीठातही B.Sc. च्या अभ्यासक्रमात मी या शिक्षणाचा समावेश केला.

१९९२ सालापासून रिटायरमेंट नंतर आपण हिंदूधर्मामध्ये काहीतही संशोधन केले पाहिजे असें मला वाटत होते. नशिबाने १९९२ ते १९९४ मध्ये मी हिंदूधर्मावर कांही लेख प्रसिद्ध केले होते. त्यांच्या जोरावर मला येथील ला द्रोब विद्यापीठात Provisional M. A. साठी प्रवेश मिळाला. मी त्यांना संशोधनाच्या विषयावर दोन पानी माहिती दिली व ते त्यांना योग्य वाटले तर ते मला प्रवेश देणार होते. माझ्या नशिबाने ते सर्व जमले व वर्षभरात मी एक संशोधन निबंध पण प्रसिद्ध केला. त्या जोरावर मला Social Anthropology या विषयात डॉक्टरेटला प्रवेश मिळाला व २००१ साली The Gurav Temple Priests Of Maharashtra या विषयावर मला डॉक्टरेट मिळाली.

१९९७ पासून आजतागायत मी मोनॅश एशिया इन्स्टिट्यूटमध्ये Adjunct Research Fellow म्हणून काम करतो आहे. Ethics & Morality आणि The Ieonic Female : Goddesses Of India, Nepal &Tibet ही दोन पुस्तकेही मी प्रसिद्ध केली आहेत. माझ्या हाताखाली सध्या डॉक्टरेटचे दोन विद्यार्थीही आहेत.

मोनॅशमधील संशोधन, आठवड्यातून २ - ३ पूजा, वास्तुशांती, लग्ने इ. विधी, आठवड्यातून एकदा Arthiritis Foundation तर्फे वयोवृद्ध (म्हणजे माझ्यापेक्षा) लोकांना गरम पाण्यातील व्यायाम शिकवणे, असा माझा सध्याचा उद्योग आहे. सौ. सुनंदाने या सर्व उपद्व्यापात मला खंबीरपणे साथ दिली आहे. ती स्वतः लायब्ररीयन होती व अजूनही अधेमध्ये काम करते. पण आसपासच्या डझनावारी मुलीबाळींना सर्व प्रकारचा सल्ला देणे हे तिचे नेहमीचे काम आहे. त्याही सारख्या मावशी मावशी करून तिच्याकडे धावत असतात.

मला नुकताच मिळालेला सन्मान For the service to Indian Community and to Education यासाठी मिळालेला आहे. त्याचे नाव. Order Of Australia Medal (oam). याचे सुवर्णपदक सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये मिळेल. आम्हाला तीन मुली व दोन नाती आहेत


आपली माणसं

No comments:

Post a Comment

Popular Posts